आयपीएलच्या खेळाडूंसाठी पठाणकोटवरुन विशेष रेल्वे गाड्या   

नवी दिल्ली : पाकिस्तानने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या अयशस्वी प्रयत्नांना भारतानेही चोख उत्तर देत प्रतिहल्ला केला आहे. यानंतर आता भारताने पाकिस्तानच्या लोहार आणि सियालकोटसह अनेक ठिकाणी प्रतिहल्ला केला आहे. भारताच्या प्रत्युत्तर हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. दरम्यान देशातर्गत देखील योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. एकुणात पाकिस्तान आणि भारतात आता युद्ध अगदी उंबरठ्यावर येऊन पोहचल्याचे बोलेल जात आहे.
 
या तणावाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा धर्मशाळा स्टेडियमवरील सामना रद्द करण्यात आला. किंबहुना असे झाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ देखील दबावाखाली आले आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, धर्मशाळा स्टेडियममधील संपूर्ण ब्लॅकआउटनंतर सामना रद्द घोषित करण्यात आला आणि शक्य तितक्या लवकर मैदान रिकामे करण्यात आले.
 
अशातच आता बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी एक मोठे विधान जारी केले आहे की, खेळाडूंना धर्मशाळेतून बाहेर काढण्यासाठी बोर्ड विशेष ट्रेनची व्यवस्था करत असल्याची माहिती समोर आली आहे. आयपीएलच्या खेळाडूंसाठी  पठाणकोटवरुन विशेष ट्रेनने पंजाब आणि दिल्ली टीमला सुरक्षित स्थळी आणणार आहे. मात्र आयपीएल थांबणार नाही, सुरूच राहणार असल्याची माहिती ही समोर आली आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष म्हणाले, सर्व खेळाडूंना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी आम्ही एका विशेष ट्रेनची व्यवस्था करत आहोत. सध्या पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना रद्द घोषित करण्यात आला आहे आणि स्टेडियम रिकामे करण्यात आले आहे.
 
आयपीएल २०२५ स्पर्धेच्या भविष्याचा निर्णय उद्याच्या परिस्थितीनुसार घेतला जाईल. सध्या, सर्व खेळाडूंची सुरक्षा ही पहिली प्राथमिकता आहे.असेही राजीव शुक्ला म्हणाले. धर्मशाला येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे प्रभावित झालेल्या या सामन्यात टॉस उशिरा झाला हे आम्ही तुम्हाला आठवण करून देतो. पंजाब फलंदाजीला आला तेव्हा प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी झंझावाती सुरुवात केली. दोघांनी मिळून १० ओवरमध्ये संघाची धावसंख्या १२२ धावांवर नेली. प्रियांशने ३४ चेंडूत ७० धावा केल्या. १०.१ ओवरच्या खेळानंतर धर्मशाळा मैदानात ब्लॅकआउट झाला. श्रेयस अय्यर एकही चेंडू न खेळता प्रभसिमरनसोबत डगआउटवर परतला. फ्लडलाइट्स बंद केल्यानंतर, शेतात अंधार पडला. यानंतर, सुरक्षा व्यवस्था लक्षात घेऊन, मैदान त्वरित रिकामे करण्यात आले.
 
पाकिस्तानच्या दहशतवादाला भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आणि नऊ ठिकाणी हल्ला करून दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली. त्यानंतर गुरुवारी सकाळी पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन सीमाभागात गोळीबार केला. तसेच भारताच्या १५ शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.पाकिस्तानच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताने लाहोरमध्ये ड्रोन घुसवून त्यांची एअर डिफेन्स सिस्टिम निकामी केली. त्यामुळे पाकिस्तानची जगभरात नाचक्की झाली. परिणामी पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. तरीही पाकिस्तानने आता पुन्हा आगळीक केली आणि जम्मूवर ड्रोन हल्ला केला.

Related Articles